सावध राहा, सुरक्षित राहा’; विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षेचा मंत्र
‘सावध राहा, सुरक्षित राहा’; विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षेचा मंत्र
साकरे, 4 अगस्त: वाढत्या डिजिटल युगात प्रत्येक नागरिकासाठी सायबर सुरक्षा ही अत्यंत महत्त्वाची बाब बनली आहे. विशेषतः विद्यार्थी वर्ग इंटरनेट आणि सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणावर वापर करत असल्याने त्यांच्यामध्ये सायबर सुरक्षेबाबत जागरूकता निर्माण करणे आवश्यक आहे. याच उद्देशाने बा. च. भाटिया माध्यमिक विद्यालय, साकरे येथे विशेष सायबर जागरूकता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमामध्ये सायबर वॉरियर विद्या विशाल सोनवणे आणि सायबर वॉरियर साक्षी तानाजी पाटील यांनी विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षेची मूलभूत तत्त्वे, ऑनलाइन फसवणुकीचे प्रकार, सोशल मीडिया सुरक्षा आणि वैयक्तिक माहितीचे संरक्षण याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. डिजिटल माध्यमांचा वापर करताना होणाऱ्या सामान्य चुका आणि त्यांचे परिणाम याविषयीही विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली.
विद्यार्थ्यांना विषय अधिक प्रभावीपणे समजावा यासाठी विविध प्रात्यक्षिके आणि खेळांचे आयोजन करण्यात आले. हॅकरचा मुखवटा वापरून सादर करण्यात आलेल्या विशेष उपक्रमातून सायबर गुन्हेगारांची कार्यपद्धती विद्यार्थ्यांसमोर उलगडण्यात आली. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना सायबर गुन्ह्यांचे वास्तव समजले आणि सुरक्षिततेचे महत्त्व अधिक स्पष्ट झाले.
यावेळी विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारच्या संशयास्पद संदेशांना प्रतिसाद देऊ नये, अनोळखी लिंकवर क्लिक करू नये, ओटीपी किंवा पासवर्ड कोणालाही सांगू नये आणि सोशल मीडियावर माहिती शेअर करताना विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले. कार्यक्रमासाठी मुख्याध्यापिका अनिता पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभले. आर. बी. आमले सर यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला. विद्यार्थ्यांनी सायबर सुरक्षेचे नियम पाळण्याचा निर्धार व्यक्त करत कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.


